Join WhatsApp group

Ads

“आदिवासी समाजाने गणेशपूजा केली तर आरक्षण रद्द? – अफवेने समाजात भीती, मानवाधिकार आयोगाची दणक्यात दखल!”

By Sarkarmzanews

September 13, 2025 6:04 pm

Ads

पातूर (दिनांक १३ सप्टेंबर २५) – पातूर तालुक्यातील आदिवासी समाजात “गणेशपूजा केल्यास आरक्षण रद्द होईल” अशी अफवा पसरल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खोट्या प्रचारामुळे अनेक गावांमध्ये घाईघाईत गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले.

धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या गंभीर प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आणि अकोला पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत कृती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदाराने आयोगाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही समाजविरोधी घटकांनी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून आदिवासी समाजात संभ्रम आणि भीती निर्माण केली.

परिणामी, परंपरेने होणाऱ्या पूजा, आरत्या व विसर्जनाच्या मिरवणुका थांबल्या. प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूगो यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

जिल्हाधिकारी आणि अकोला पोलिस अधीक्षकांना तातडीने चौकशी करून कृती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, अहवालाची प्रत आयोगाला ईमेलद्वारे पाठविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.या घटनेमुळे पातूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने अफवांवर त्वरित नियंत्रण आणावे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. पुढील चौकशी अहवालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!